कोल्हापुरातील करोना परिस्थिती गंभीर नसल्याचा केंद्रीय पथकाचा मुद्दा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धुडकावून लावला. कोल्हापूरची परिस्थिती गंभीरचं आहे, असा उल्लेख करून टोपे यांनी ती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केला असल्याचा दावा त्यांनी आज(शुक्रवार) पत्रकारपरिषदेत केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या व मृत्यू संख्येमध्ये वाढ होत असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय पथकाने जिल्हा रुग्णालय रुग्णालयांना भेटी दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी पत्रकारांशी बोलताना कोल्हापुरातील परिस्थिती गंभीर नसल्याचे अधोरेखित केले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात करोना परिस्थिती गंभीर?; छे, छे… सर्व काही ठीकठाक… केंद्रीय पथकाचा निर्वाळा!

केंद्रीय पथकाच्या मताशी सहमत आहात का? असा प्रश्न येथे उपस्थित केला असता आरोग्यमंत्री टोपे यांनी आपण सहमत नाही, असे म्हणत केंद्रीय पथकाचा मुद्दा फेटाळून लावला आहे.

कोल्हापुरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल

करोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा २८ टक्‍क्‍यांनी अधिक होते. राज्याच्या अन्य भागात ते त्याहून अधिक कितीतरी होते. आता कोल्हापुरातील परिस्थिती काही प्रमाणात कमी होत आहे; मात्र धोका टळलेला नाही. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लाटेच्या शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यादृष्टीने राज्यातील अशी संभाव्य जिल्ह्यांसाह कोल्हापुरात आवश्यक ती उपाययोजना, कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुकाने सुरू होण्याबाबत साशंकता-

कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी आज मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसेच, व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत टोपे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा चौथ्या टप्प्यात होता. तो तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर दुकाने सुरू होऊ शकतील. मात्र जिल्हा अद्याप तिसऱ्या टप्प्यात पोहचलेला नाही. तेथे पोहोचण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याबाबत नूतन जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होईल. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची भूमिका जाहीर केली जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. यामुळे कोल्हापूरसह जिल्ह्यातील दुकाने नेमके कधी सुरू होणार, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.