गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवादी हल्ला

हेमलकसा व कारमपल्लीच्या मध्ये कियर गावाजवळचा भूसुरुंग स्फोट हा नक्षलवाद्यांच्या कंपनी दलमने घडवून आणला असून यात पेरमिली दलम कमांडर साईनाथ, गट्टा दलम प्रमुख भास्कर, भामरागड एरिया दलम कमांडर दिनेश व गट्टा उपकमांडर रमको या चार जहाल नक्षलवाद्यांचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस दल यासंदर्भात काहीही बोलायला तयार नसले तरी स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून या सर्वाचा त्यात सहभाग असल्याची माहिती आहे.

लगतच्या छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २६ जवान शहीद झाले. याच हल्ल्याची पुनरावृत्ती गडचिरोलीत करायची, अशी नक्षलवाद्यांची व्यूहरचना होती. त्यामुळे तेथील नक्षली हल्ल्यानंतर गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हालचाली अतिशय वेगाने वाढल्या होत्या, परंतु गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान सुरू केले असल्यामुळे नक्षलवादी जंगलाच्या बाहेर पडू शकत नव्हते. नक्षल अभियान राबविताना कोपर्शी व पूलनारच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी परस्परांच्या समोर येऊन धडकल्याने चकमक उडाली. नंतर शक्तिशाली भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटाच्या कटाची आखणी नक्षलवाद्यांच्या कंपनी दलमने केली होती. त्यात साईनाथ, भास्कर, दिनेश व  रमको या चार जहाल नक्षलवाद्यांचा सहभाग होता, अशी माहिती समोर येत आहे. पोलीस यासंदर्भात अधिकृतपणे बोलत नाहीत.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून कंपनी दलमच्या माध्यमातून हे चारही जहाल नक्षलवादी परस्परांच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे, साईनाथला हिंसक कारवायांसाठी गडचिरोली जिल्हय़ाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तो सूरजागड येथील ८३ ट्रकच्या जाळपोळीनंतर मोठय़ा हिंसक घटनेच्या तयारीत होता. सुकमा हल्ल्यात २६ जवान शहीद झाले होते. त्याप्रमाणेच मोठी मनुष्यहानी घडवून आणण्याचा बेत नक्षल्यांचा होता, परंतु गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी धर्याने लढा देत नक्षलवाद्यांचा कट धुळीस मिळविला.

दरम्यान, आता गडचिरोली पोलीस या संपूर्ण घटनेचा मागोवा घेत आहे. भूसुरुंग आधीच पेरून ठेवले होते की चकमक झाल्यानंतर अतिरिक्त कुमक कोपर्सी येथे जाणार याची माहिती नक्षलवाद्यांना आधीच होती, याचा शोध घेतला जात आहे.