वेताळवाडी किल्ल्यावरील तोफेला स्कॉटलंड पद्धतीने बनविलेला भारतातील पहिल्या तोफगाड्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत रविवारी 28 एप्रिल रोजी लोकार्पण झालं.

सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसवण्यात आला. त्यामुळे या गाड्यावर अत्यंत वैभवात विराजमान झाले आहे. चाळीसगाव येथील युवा उद्योजक मंगेश दादा चव्हाण व भारत विकास परिषदेचे क्षेत्रीय सचिव श्रीपाद टाकळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी अत्यंत उत्साहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व हळदा, गलवाडे, येथील ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवला.

हळदा गावातून श्रीराम मंदिर येथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून संपूर्ण गावातून शिव पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या समारोपानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार व परिसरातील ग्रामस्थ आणि मान्यवरांनी किल्ल्यावर हजेरी लावली. या तोफगाड्याचे विधिवत पूजा करून भंडारा उधळीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो, गड किल्ले वाचवा महाराष्ट्र वाचवा, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

हा तोफगाडा चाळीसगाव येथील सह्याद्रीचे शिलेदार अजय जोशी यांनी बनविला असून यासाठी आलेला खर्च संस्थेच संपर्क प्रमूख प्रकाश नायर यांनी स्वतः उपलब्ध करून दिला आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मंगेश दादा चव्हाण यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, अत्यंत निस्वार्थपणे सह्याद्री प्रतिष्ठानचे शिलेदार महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी योगदान देत आहेत. पुढील पिढीसाठी हा इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी समाजातील इतर घटकांनी देखील सहभागी व्हावे. मी सदैव सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कामासाठी तन-मन-धनाने मदत करेल.

यावेळी त्यांनी पुढील चार तोफगाड्यांसाठी दोन लाख रुपयांचा स्वराज्य निधी सह्याद्री प्रतिष्ठानसाठी जाहीर केला. यावेळी श्रीपाद टाकळकर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनीही उपस्थितांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले.