कोपर्डी हत्या प्रकरणातील तीनही आरोपी दोषी

कोपर्डीतील १५ वर्षे वयाच्या शालेय मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या गेल्या वर्षीच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. एकवटलेल्या सकल मराठा समाजाने मोर्चे काढले. अनेक संघटनांनी आंदोलने केली. त्यानंतर खटला उभा राहून आज तिघे आरोपी दोषी असल्याचे न्यायालयात  सिद्ध झाले. मात्र पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्यायासाठी १६ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. कायद्यातील तरतुदीनुसार तिघांना जन्मठेप की फाशी यावर मंगळवारी (दि. २१) व बुधवारी (दि. २२) युक्तिवाद होईल. कुटुंबीयांनी मात्र फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणी केली आहे.

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Dombivali K V Pendharkar College Sports Complex Inaugurated Retired Justice Hemant Gokhale
ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी क्रीडासंकुलांची गरज, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे प्रतिपादन
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी

ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाताना नेहमीच छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. कोपर्डीतील मुलीलाही हा प्रकार सहन करावा लागला होता. छकुली हे तिचे घरातील लाडाचे नाव. उत्कृष्ट कबड्डी व खो-खो पटू असलेली व इयत्ता ९ वीत शिकणारी ही मुलगी रोज पाच किमी अंतरावरील कुळधरणच्या शाळेत जात होती. रस्त्यात तिला हा प्रकार सहन करावा लागत असे. बलात्कार व खुनाची घटना कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ च्या सायंकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान घडली. त्याच्या दोन दिवस आधी तिघांनी तिची छेड काढली होती. गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे (२६) अशी गुन्ह्य़ातील या तिघा नराधमांची नावे.

घटनेच्या दिवशी आईने सांगितले म्हणून मुलगी जवळच राहणाऱ्या आजोबांकडे मसाला आणण्यासाठी सायकलवर गेली होती. ती परतलीच नाही. शोध घेणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह व सायकल रामभाऊ सुद्रिक यांच्या शेतात आढळली. मुलीचा नातलग शिवराम गोरख सुद्रीक यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार चारी रस्त्याने सुद्रीक व त्याचा मित्र जात असताना मुलीची सायकल शेतात दिसली. त्यांनी मुलीला हाका मारल्या, तेव्हा जितेंद्र शिंदे हा लिंबाच्या झाडीखाली पळताना दिसला. तेवढय़ात मुलीची आई व बहीणही तेथे आल्या. दोघींना तेथे मृतदेहाजवळ थांबवून शिवराम जितेंद्रच्या मागे पळाला. तेव्हा त्याच्या चपला तेथेच बाजरीच्या शेतात पडल्या. जितेंद्र हा कोपर्डीतील त्याच्या घरी गेला. तेवढय़ात तेथे पोहोचलेल्या शिवराम सुद्रीक याने जितेंद्रने छकुलीला मारून टाकले, असे सांगितले. परंतु जितेंद्र आईच्या हाताला झटका देऊन पळाला. परत आलेल्या शिवरामला शेतातच जितेंद्रची मोटरसायकल पडलेली दिसली.

घटनेपूर्वी दोन दिवस आधी याच मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी तिची छेड काढली होती. तिच्या घरावरून चकरा मारतानाही अनेकांनी पाहिले होते. त्यापूर्वी छकुलीला शाळेतून येताना तिघांनी अडवले होते, जितेंद्रने तिचा हात पकडला होता, परंतु ग्रामस्थ पाहून भैलुमे व भवाळ या दोघांनी ‘आपण तिला नंतर काम दाखवू’ असे सांगत सोडले होते. त्यामुळे छकुली दि. १२ व दि. १३ रोजी शाळेतच गेली नाही. तिने ही घटना बहिणीलाही सांगितली होती. दि. १३ रोजीच्या सायंकाळीच तिघांनी तिला आजोबांच्या घरून परत जाताना अडवले, जितेंद्रने तिच्यावर बलात्कार केला, व नंतर गळा आवळून ठार केले.

घटनाक्रम

  • या घटनेची फिर्याद दि. १४ च्या मध्यरात्री १ वाजता दाखल झाली. एक आठवडा स्थानिक पोलिसांनी तपास केला.
  • मोठा जनक्षोभ उसळल्याने तपास २० जुलैला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. दि. १५ रोजी जितेंद्रला श्रीगोंद्यात, दुसऱ्या दिवशी भवाळला कर्जतमध्ये तर दि. १७ रोजी भैलुमेला पुण्यात अटक करण्यात आली. जितेंद्र व भवाळ हे दोघे विवाहित आहेत तर भैलुमे हा शिक्षण घेत आहे.
  • दि. १० ऑक्टोबरला दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
  • दि. २० ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात सुनावणी सुरू झाली. तत्पूर्वी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. नगरच्या वकिलांनी आरोपींचे वकीलपत्र घेण्यास नकार दिल्याने न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत तिघा वकिलांची आरोपींसाठी नियुक्ती केली.
  • बाल लैंगिक अत्याचाराचे खटले चालवण्याचा अधिकार असलेल्या विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यापुढे सुनावणी. सरकारतर्फे एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी भवाळच्या वतीने एक साक्षीदार तपासण्यात आला. छकुलीच्या वर्गातील मैत्रिणीचीही साक्ष नोंदवण्यात आली.
  • मे २०१७ पर्यंतच्या ५ महिन्यांच्या कालावधीत साक्षीदार तपासणीचे काम पुर्ण.

विधानसभेत पडसाद

मोठा जनक्षोभ निर्माण होऊ लागल्याने सर्वात प्रथम कर्जतमध्ये दि. १४ व दि. १५ जुलैला बंद पाळण्यात आला. नंतर जिल्ह्य़ात बंद पाळला जाऊ लागला. २० जुलैला विधानसभेचे कामकाज बंद पाडण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी कोपर्डीला भेटी दिल्या. विरोधामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांना कोपर्डीला भेट न देताच परत जावे लागले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व एसटी बसचे आश्वासन पूर्ण झाले. पोलीस चौकी, रस्ता, पीडित मुलीला विमा रक्कम ही कामे अपूर्णच आहेत.

मराठा समाज एकवटला

कोपर्डीच्या घटनेने सकल मराठा समाज आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत एकवटला. त्यासाठी जिल्ह्य़ाजिल्ह्य़ातून मोर्चे काढले जाऊ लागले. नंतर इतर मागण्यांची जोड मोर्चाला देण्यात आली. पहिला मोर्चा ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेतून काढण्यात आला. एकूण ५८ मोर्चे काढले गेले. या मोर्चानी सत्ताधाऱ्यांना हादरवले.

आरोपींवर हल्ला

कोपर्डीच्या निर्घृण घटनेने मराठा समाजात मोठी चीड व्यक्त केली जात होती. त्यामुळे आरोपींना अटक केल्यानंतर कोठडीच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणले जात होते, तेव्हा महिला, तरुण त्यांच्यावर अंडी, चपला फेकत. सुनावणी सुरू झाल्यावर मराठा समाजातील अनेक जण उपस्थित राहत होते. १ एप्रिल २०१७ रोजी शिवबा संघटनेच्या चौघांनी पोलीस बंदोबस्त असताना आरोपींवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चौघांना अटक करण्यात आली. त्याचा गुन्हा भिंगारच्या कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहे. या चौघांचा जामीनअर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळला. गुन्ह्य़ाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.