उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर या ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा डिजिटल उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी अखेरचं एकदा मृतदेह पाहण्याची विनंती करुनही बळजबरीने अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे. दरम्यान ही घटना ताजी असतानाच बलरामपूर या ठिकाणीही एका युवतीवर बलात्कार झाल्याची आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला म्हणायचे की दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत. दहशत मोडून काढा, गुंडगिरी सुरु असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे. या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिरा भाईंदर यांच्या हस्ते मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा झाला. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला त्यावेळी ते बोलत होते.