छत्रपती संभाजीराजे यांनी आज (शनिवार) कोपर्डी येथे जाऊन सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कोपर्डीमधील निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. सहा महिन्यात हे सर्व प्रकरण निकाली लागायला हवं. अशी मागणी संभीजाराजेंनी पत्रकारपरिषदेत केली आहे.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, “जे दोषी आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय झाला आहे. हे सरकारला कानावर घालण्यासाठी देखील मी इथं आलो आहे. २०१७ मध्ये या आरोपींना शिक्षा झाली आणि नंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एक कायदा असा सांगतो की, दोषी जे असतात त्यांना उच्च न्यायालयात अपीलसाठी दोन वर्षे संधी मिळते. म्हणून त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा एकदा उच्च न्यायालयात अपील केली होती. पण २०१९ ते २०२० एक वर्ष होऊन गेलं व आजही ती केस प्रलंबितच आहे. मी इथं पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलो, त्यांच्याही मनात आक्रोश होता. त्यांची एवढीच इच्छा होती की समाजाला न्याय मिळावा आणि आमच्या भगिनीला न्याय मिळावा. म्हणून माझी सरकारला हीच विनंती राहणार आहे, तुम्ही तत्काळ उच्च न्यायालयाला अर्ज करावा व त्यामध्ये तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे, विशेष खंडपीठ स्थापन केलं पाहिजे. विशेष खंडपीठाच्या माध्यमातून सहा महिन्यात हा केसचा निकाल लागला पाहिजे. इथून गेल्यानंतर हे मी ताबडोब मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.”

तर, “२०१६ला हा सामुहिक बलात्कार झाला. २०१७ ला ते दोषी असल्याचा निकाल लागला. आता २०२१ आहे. अजूनही पुढची कारवाई का झाली नाही? त्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी केली जात नाही. हे लक्षात घेता, आता राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, सहा महिन्यांत हा विषय निकाली काढावा. या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.”, असं संभाजीराजेंनी कोपर्डी येथे जाण्या अगोदर बोलून दाखवलं होतं.