आरक्षणाच्या मागणीसाठी २० ऑगस्टपासून मराठा बांधवांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ९ ऑगस्टला जे आंदोलन करण्यात आले त्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्यामुळे यापुढचे आंदोलन रस्त्यावर होणार नाही अशी घोषणा याआधीच करण्यात आली होती. त्यानुसार आता मराठा बांधवांनी आरक्षण आणि इतर सर्व प्रमुख मागण्यांसाठी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार केव्हा मुख्यमंत्र्यानी लेखी द्यावे,मराठा क्रांती मूक मोर्चाची मागणी यावेळी करण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरासह पुण्यात देखील ठिय्या आंदोलन करण्यात आले.या दरम्यान आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे गुन्हे पोलीसांनी मागे घ्यावेत. तसेच आरक्षण केव्हा देणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी द्यावे.या मागणीसाठी राज्यभरातील विविध ठिकाणी २० ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्यात येणार असून पुणे विभागीय कार्यालया समोर देखील करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयक समितीच्या शांताराम कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.

यावेळी कुंजीर म्हणाले की,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे शांततेच्या मार्गात काढून देखील राज्य सरकार ने त्याची दखल घेतली नाही.त्याच्या निषधार्थ ९ ऑगस्ट रोजी राज्यातील ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यावर चुकीच्या पध्द्तीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ते पोलीसांनी मागे घ्यावे.तसेच मागील महिन्याभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावे.यासह अनेक मागण्यांसाठी राज्यभरात २० ऑगस्टपासून चक्री उपोषण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

९ ऑगस्टला झालेल्या आंदोलनात बाह्यशक्ती घुसल्या त्यामुळे हिंसाचार झाला. यापुढे आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन होणार नाही, असे मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले. पुण्यात १० ऑगस्टला पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली. आता चक्री उपोषण २० ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक समितीने केली आहे.