मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवाल राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

उदयनराजे म्हणाले, “मी माझ्यावतीनं नाही तर आपल्या पिढीच्यावतीनं आपल्या आगोदरच्या पिढीतील सर्व राजकीय नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की, मराठा समाजाचा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला? मला विचाराल तर फक्त राजकारणासाठी आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. यावर आजवर कुणी खुलासा केलेला नाही, आधीच्या पिढीतील लोकांना आपण मतदान केलं त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे.”

“जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत बघणार आहात. तुम्ही हा प्रश्न सोडवला नाहीत पण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. उद्या आपली पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा कुठल्या तोंडान त्यांना उत्तर द्याल, शरमेनं मान खाली घालावी लागेल. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण अजूनही तेच सत्तेत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजेंनी सत्तेतील मराठा नेत्यांनाही सवाल केला आहे.

यावेळी उदयनराजेंनी काही प्रश्नही उपस्थित केले ते म्हणाले, “मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढी वर्षे प्रलंबित का राहिला?, त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी प्रश्न का सोडवला नाही? मंडल आयोगाच्यावेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही? मंडल आयोग लागू केला तेव्हा प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलं. पण यावेळी सोयीनुसार मराठा समाजाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला. त्यावेळेसच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने याकडे लक्ष का दिलं नाही. इतरांचे अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही. त्यांना न्याय दिलेला योग्यच आहे पण प्रत्येकाला न्याय तर आमच्यावर अन्याय का? या उत्तर सत्तेत असलेल्यांनी द्यावं.

आरक्षणावरुन जातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं

“शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचं तत्व सांगितलं. पण राजकारण्यांनी आरक्षणावरुन जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं. जर आज मराठा समजाला न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात आपल्यावर अन्याय झाल्याची भावना राहिल. यामुळे जातीतील तेढ वाढत जाणार. मराठा समाजासह इतर सर्व समाजातील आमदार, खासदारांची मराठा आरक्षण मार्गी लावण्याची नैतिक जबाबदारी आहे.”

मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून परीक्षा घ्या

“परीक्षा घेताना मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घेण्यात याव्यात. आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर त्या भरण्यात याव्यात. जर आरक्षणाबाबत कोर्टात निकाल लागला नाहीतर मराठा समाजाचा निरस होईल”