कोल्हापुरात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत गोंधळ घालण्याची प्रथा आजही कायम राहिली. सभेला सुरुवात होण्यापूर्वी अध्यक्षांच्या प्रास्ताविकाआधीच काही सभासदांनी हा गोंधळ घातला. यांपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

वार्षिक कामांचा आणि भावी योजनांचा आढावा घेतल्यानंतर सभेचे अध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी जेवणाच्या विश्रांतीनंतर अर्ध्या तासाने सभा घेण्यात येईल अशी घोषणा केली. याला काही सभासदांनी जोरदार हरकत घेतली. अद्याप केवळ एक वाजला असताना भोजनासाठी वेळ घालवण्यापेक्षा कामकाज पुढे सुरू ठेवावे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. संचालक सुशांत शेलार यांनी नियमावलीप्रमाणे कामकाज होईल, असे सांगत विश्रांतीचे समर्थन करीत राहिले. पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

दरम्यान, राजेभोसले सभागृहातून भोजनकक्षाकडे जात असताना त्यांना सभासदांनी घेराव घातला. त्यांना सभा सुरू ठेवण्याचा एकच आग्रह केला. संचालक सतीश रणदिवे, अभिनेत्री संचालिका वर्षा उसगावकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी सभासदांनी सभा सुरू करा अशा घोषणा सुरूच ठेवल्या त्यामुळे अखेर राजेभोसले पुन्हा मंचावर आले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सभासदांना खाली जाण्यास सांगितले. यानंतर सभा सुरू झाली मात्र तरीही कायदेशीर बाबींवरून वाद, घोषणाबाजी सुरूच राहिली.

वादाचे काय होते कारण?

आजच्या वादाचे मुख्य कारण एक न्यायालयीन निकाल आणि त्यावरून झालेली फलकबाजी हे होते. अभिनेत्री छाया सांगावकर यांनी जुलै २०१४ रोजी माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. याप्रकरणी अष्टेकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकाल लागल्यावर गेल्या आठवडात अष्टेकर यांनी या प्रकाराविरोधात अभिनेत्री सांगावकर, अर्जुन नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांच्या विरोधात २५ लाख रुपयांचा अब्रुनुकसानीच्या दाव्यासोबत फौजदारी गुन्हा नोंद केल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, मात्र विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अष्टेकरांच्या अभिनंदनाचा तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्या तिघांच्या निषेधाचा फलक येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर काहींनी लावला होता. अष्टेकर यांनीच हा फलक लावून महामंडळ कार्यकारिणीची बदनामी केली असे म्हणत त्यांना महामंडळाने नोटीस लागू केली. या नोटीस प्रकरणाचा जाब आणि त्यावरून महामंडळाने केलेली कारवाई यावरून आज सभेत वाद पेटला.

सभा पुन्हा सुरू झाली तरी ती शिस्तबद्ध नव्हती. मंचावर येऊन सभासद आपले म्हणणे तावातावाने मांडत राहिल्याने पुन्हा वाद, गोंधळ हेच चित्र कायम राहिले. अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा सुरू राहिल्या. यात सभेचे कामकाज जवळपास स्तब्ध, बेशिस्त राहिले.