मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या समस्येची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एक महत्वाचा निर्णय राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. लवकरच यावर कामही सुरु करण्यात येणार असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, “मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी झालेला वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून उरण येथील ऊर्जा प्रकल्पाची क्षमता येत्या दोन वर्षात १००० मेगावॅटने वाढवण्याचा निर्णय ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे जर सध्याचं पॉवरग्रीड काही कारणाने बंद पडलं तरी त्यामुळे मुंबईतला वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या भेडसावणार नाही”

१२ ऑक्टोबर रोजी महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाण्यामधील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला फटका बसला होता.

रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला होता, तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापुरातील वीज पुरवठा बंद पडला होता.