उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तूर ते होळी रस्त्यावर पुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी रस्ता करण्यात आला होता. परंतु शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्यायी रस्ताच वाहून गेला आहे. मागील चार दिवसांपासून रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तालुक्यातील सास्तूर ते होळी रस्त्यावर जुन्या होळी पाटीजवळ मोठा ओढा आहे. पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यानंतर वाहतूक तासनसास खोळंबते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ओढ्यावर पुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. पुलाचे काम सुरु असल्याने बाजुनेच पर्यायी रस्ता तयार करून वाहतुकीला खुला करून देण्यात आला आहे. हा रस्ता गुलबर्गा-लातूर महामार्गाला जोडला गेला आहे. त्यामुळे गुलबर्गा, उमरगा शहरांना जाण्यासाठी लोहारा, माकणी, सास्तूर येथील प्रवाशी या एकमेव रस्त्याचा अवलंब करतात. शिवाय पुणे, उमरगा या लांब पल्ल्याच्या बस याच रस्त्यावरून धावतात. त्यामुळे या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. परंतु, शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हा पर्यायी रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाची पुणे, उमरगा या गाड्या बंद झाल्याने तालुक्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुरूस्तीचे काम सुरू अतिवृष्टीमुळे पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अवघ्या तीन ते चार दिवसांत काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. पुलाचे काम प्रगतीपथावर असून महिन्याच्या आत पूर्ण होईल. पी. पी. आकोसकर, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोहारा