राज्यातील करोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, आज राज्यात नव्याने ५,२४६ करोनाचे रुग्ण आढळून आले. तर ११७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. तसेच आत्तापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान, आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या १७,०३,४४४ झाली आहे.