मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नाही असं आज दिसून आलं असंही चंद्रकांत पाटील यांनी मांडलं. मराठा आरक्षणाच्या केसचा पुकारा झाला तेव्हा कोणीही हजर नव्हतं. याला काय म्हणायचं? महाराष्ट्र्र सरकार एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नी गंभीर नाही हेच दिसून आलं आहे. मराठा आरक्षण सरकारला द्यायचं नाही हेच यातून दिसून येतं आहे. आता चार आठवडे मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती दिली आहे त्यामुळे सगळं काही ठप्प झालं आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “दीड महिना वाया का घालवला? घटनापीठाची मागणी आधीच का नाही?”

दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्जना केली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने आम्ही बांधील आहोत. आधी स्थगिती तर उठवा असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. या प्रकरणात भाजपाला मुळीच राजकारण करायचं नाही. मात्र सरकार मराठा आरक्षण प्रकरणी गंभीर नाही हा आमचा आरोप आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलवून एकदा बैठक घेण्याचं नाटक ठाकरे सरकारने केलं. मात्र मराठा आरक्षण प्रश्नी पुढची दिशाच ठरलेली नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- घटनापीठापुढेच आम्हाला मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडायचा आहे- अशोक चव्हाण

पाच जणांच्या घटनापीठासमोर हे प्रकरण न्यायचं आहे ही भूमिका अयोग्य नाही मात्र आधी स्थगिती तर उठवा. सुप्रीम कोर्टाने दिलेली अंतरिम स्थगितीही या सरकारला उठवता आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. शिक्षण क्षेत्रात गोंधळ माजला आहे. कर्नाटक सरकारने ८ लाख विद्यार्थ्यांची फिजिकली घेतली आणि  त्यांची काळजीही घेतली. काही विद्यार्थी बाधित झाले असतील. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षांच्याबाबती महाराष्ट्रात गोंधळ सुरु आहे असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. शाळा आणि महाविद्यालयं कधी सुरु होणार हा प्रश्नही अद्याप अनुत्तरीत आहे असंही ते म्हणाले.