करोनाचं संकट मागे टाकून सगळं जग फिनिक्स भरारी घेईल असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी केलं आहे. सध्या सगळ्यांनी सगळ्यांना सांभाळण्याचा काळ सुरु आहे. आपला देश मुक्ताई, ज्ञानेश्ववर, बहिणाबाईंचा आहे. थोडी वाट बघा या सगळ्यातून आपण नक्की बाहेर पडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या घडीला सगळ्यांची भूक महत्त्वाची आहे. पोलीस आणि डॉक्टर्स यांचीही काळजी घ्या असंही त्या म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एक भाकरी आपण सगळे मिळून खाऊ असंही त्या म्हणाल्या.

“फक्त आमच्या मुलांचीच नाही तर सगळ्यांचीच भूक महत्त्वाची आहे. करोनासारख्या आजारातून आपण सगळेजण शिकतो आहोतच. हे संकट माणसांची मनं अलवार केल्याशिवाय राहणार नाही. हे संकट दुःखाची जाणीव दिल्याशिवाय राहणार नाही. या संकटाच्या इतक्या ज्वाळा उठल्या आहेत तरीही लोक, जनता, लेकरं ही फिनिक्स भरारी घेतील याची मला खात्री मला आहे. हे संकट संपणार आहे.. ही रात्र सरुन उद्याची स्वप्न आपण पाहणार आहोत”

कल की बात खुदा के हात, आपल्याला जगायचं आहे हा विचार प्रत्येकाच्या मनात. त्यातून चांगलंच होणार आहे असंही सिंधुताई म्हणाल्या. हे संकट संपल्यानंतर नवराष्ट्राची निर्मिती होईल. वाईट पणा सोडून द्या मानवता शिका असंही माई म्हणाल्या.