विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून नागपुर येथे सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच निषेध करत, भाजपा आमदारांनी आज 'मी पण सावरकर' असे वाक्य लिहिलेली भगवी टोपी घालून विधिमंडळात प्रवेश केला. शिवाय राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत जोरादर घोषणाबाजी देखील केली. या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी, राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले. सावरकरांच्या नावाचा उपयोग भाजपा केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी करत आहे. देशात होणारे बलात्कार, महिलांवरील अत्याचार याविषयी यांना काहीच चिंता वाटत नाही. भाजपाचे खासदार, आमदार त्यांचे नेते बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये असल्याने, या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे. मग त्यांनी माफी कशा करता मागावी? आमची कोंडी करण्याचा प्रयत्न होऊच शकत नाही, सभागृहात १७० पेक्षा अधिकजण महाविकास आघाडीबरोबर आहे. त्यामुळे सरकारची कोंडी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर, कोणत्या विषयासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी? राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्बवत नाही. असे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा सरकारला कोडींत पकडण्याचे संकेत अगोदरच मिळाले होते. आज कामकाजाला सुरूवात होण्याआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आमदार ‘मी पण सावरकर’ उल्लेख असलेल्या टोप्या परिधान करून विधिमंडळ परिसरात दाखल झाले. त्यानंतर विधान सभा आणि विधान परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर भाजपा आमदारांनी निदर्शनं केली.