आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची असा ठराव राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये झाला आहे असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना या ठिकाणी बोलताना केला. अर्जुन खोतकर यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यातली युतीची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या आहेत, असंही खोतकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय कार्यकारीणीमध्ये झालेला हा ठराव शिवसेना कायम ठेवणार की भाजपाशी युती करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री हे सांगत आहेत की शिवसेना आमच्यासोबतच असेल. शिवसेना आमची साथ सोडणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पंढरपूरच्या सभेत युतीचा निर्णय जनताच घेईल असे म्हटले आहे. तर युतीबाबत काहीही चर्चा झाली नाही वेळ येईल तेव्हा पाहू असे काही शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. त्यामुळे युती होणार की नाही हा पेच अद्यापही कायम आहे.