” महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जिथे बाहेरच्या देशांमधले मौलवी जात आहेत. ते काय करत आहेत ते माहित नाही. पोलीसही तिथपर्यंत पोहचू शकत नाहीत. तिथे नेमकं काय शिजतंय हे ठाऊक नाही. पण पोलिसांच्या माहितीनुसार मोठं काहीतरी घडवण्याचं कारस्थान रचलं जातं आहे.” असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मुंबईत झालेल्या अधिवेशनातील भाषणादरम्यान केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्रात असे काही भाग आहेत. इतर राज्यांचं मला ठाऊक नाही आणि ही माहिती माझ्यापर्यंत कशी आली ते सांगत नाही पण लक्षात घ्या असे काही भाग आपल्या राज्यात आहेत त्या भागांमध्ये काही मौलवी जात आहेत. ते काय करत आहेत? काय शिजतंय, काय होणार ते काहीही कळत नाही. मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की प्रचंड काहीतरी घडवण्याचा एक डाव शिजतो आहे. मी कोणत्या जागा आहेत ते सांगणार नाही. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतची माहिती मी देणार आहे. पोलिसांना मोकळे हात देणं अशावेळी गरजेचं आहे हेदेखील मी सांगणार आहे. ” असंही राज ठाकरे म्हणाले.

“पोलिसांना ४८ तासांसाठी मोकळं सोडा, मग बघा. कारण माझा मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे. कोण कुठून आलंय, ते कुठे राहतात. त्यांना मदत करणारे कोण आहेत याची पूर्ण माहिती पोलिसांना आहे.” असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. “बांगलादेशातून भारतात यायचं असेल तर अवघे अडीच हजार रुपये लागतात. अडीच हजार दिलेत की भारतात येता येतं असं मला परवा कुणीतरी सांगितलं. पाकिस्तानचे लोकही नेपाळमार्गे येत आहेत. माझं तर केंद्र सरकारला जाहीर सांगणं आहे, सर्वात आधी काय कराल तर ती समझौता एक्स्प्रेस बंद करा” असंही आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

“मी याआधीच्या भाषणांमध्येही बोललो होतो. माझ्या भाषणांच्या काही क्लिप्स यू ट्युबवर फिरत आहेत. मी तेव्हाही म्हटलं होतं आणि आजही तेच म्हणतो आहे की अनेक मोहल्ले देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर जायची गरज नसेल आतच लढावं लागेल. आतच धोका इतका निर्माण झालं आहे की कोण येतंय कोण जातंय हे समजतच नाही.”

“बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या मुसलमानांना हाकलून देण्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे.