महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या कालावधीमध्ये म्हणजेच सप्टेंबर (भाद्रपद महिन्यात) करोनाची तिसरी लाट येईल असं मत महाराष्ट्रातील करोना टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर शाशांक जोशी यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील दुसरी लाट २१ मे ते १५ जूनदरम्यान ओसरेल असं सांगतानाच तिसरी लाट १०० टक्के येणार, यासंदर्भात कोणतंही दुमत नाहीय, असं जोशी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले आहेत. मात्र जास्तीत जास्त लोकांना लसीकरण केल्यास या लाटेत होणारा करोनाला प्रादुर्भाव कमी करता येईल असंही जोशी म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील तिसऱ्या लाटेसंदर्भातील शक्यता व्यक्त करताना ही लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी असणार मात्र दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असणार असंही जोशी म्हणालेत. महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या मध्यात आहे. मेच्या शेवटापर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला दुसरी लाट ओसरेल. त्यानंतर तिसरी लाट येईल असं सर्व डॉक्टर्स म्हणतायत. तर यासंदर्भात काय उपाययोजना कराव्या लागतील कारण आता लॉकडाउनला अनेकांचा विरोध आहे. लॉकडाउन नको असं लोकं म्हणतातय, असा प्रश्न जोशी यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जोशी यांनी करोनाची तिसरी नाही तर चौथी आणि पाचवी लाटही येणार असल्याचं मत व्यक्त केलं. गथलाथनपणा केला, मास्किंग केलं नाही, सोशल डिस्टन्सिंग केलं नाही. परत अनेक ठिकाणी लोक गर्दी करु लागले तर सप्टेंबरपर्यंतच तिसरी लाट येणार. या लाटेत म्युटंट विषाणू असणार, अशी शक्यता जोशींनी व्यक्त केलीय.

“कुठल्याही विषाणूच्या लाटा येतातच. चार ते पाच लाटा येणार यात काही शंका नाही. अमेरिकेतील मिशिगनमध्ये सध्या करोनाची चौथी लाट आलीय. फ्रान्समध्ये चौथी लाट आहे. लाट येणारच आहे पण त्याची दाहकता कशी कमी करता येईल याबद्दल चर्चा करता येईल,” असं जोशी म्हणाले. “पहिली लाट मागच्या वर्षी आली. दुसरी लाट झपाट्याने आली. यामध्ये स्ट्रेन नवा होता. प्रादुर्भाव वेगाने होत होता. रिकव्हरीही वेगाने होत होती. मृत्यूदर कमी होता. विदर्भात डबल म्युटंट विषाणूही आढळून आलाय. जिनॉमिक टेस्टींग आणि सर्विहलन्स वाढवायला हवा. तो आपण वाढवत नाही आहोत. फार कमी लेव्हलवर आपण हे करतोय. २५-२५ सॅम्पल आपण कलेक्ट करुन चाचण्या करतोय. कुठला स्ट्रेन आहे काय आहे मला ठाऊक नाही पण त्याचा सखोल अभ्यास केला जात नाहीय,” अशा शब्दांमध्ये जोशी यांनी विषाणूसंदर्भात अधिक संशोधनाची गरज व्यक्त केली.

“मुंबईत प्रादुर्भाव कमी झाला असेल तरी राज्यातून दुसरी लाट बाहेर पडायला २१ मे ते १५ जूनपर्यंतचा किमान कालावधी लागेल. ते सुद्धा आपण योग्यपद्धतीने वागलो तरच. करोना आपल्याबरोबरच तीन चार वर्ष राहणार आहे,” असंही जोशींनी म्हटलं आहे. बंगालमध्ये ट्रीपल म्युटंट आहे. दिल्लीत युके स्ट्रेन आहे. तसाच म्युटंट विषाणू तिसऱ्या लाटेत असेल अशी भीती जोशींनी व्यक्त केलीय. मात्र आपण तिसरी लाट येण्याआधी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण केलं तर प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असंही जोशी म्हणाले आहेत.

“चौथी आणि पाचवी लाट येऊन गेली हे कळणार नाही लोकांना कारण आपण अनेकांचं लसीकरण केलेलं असणार. आपल्याला हर्ड इम्युनिटीसाठी ८० टक्के लोकांचं लसीकरण करावं लागणार. हे अशक्य आहे. त्यामुळेच जोपर्यंत आपण करोनासंदर्भातील शिस्त लावणार नाही तोपर्यंत आपण करोनावर मात करु शकणार नाही,” असं जोशी म्हणाले आहेत.