देशातील रस्ते अपघातांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचे द्वितीय स्थानावरील सातत्य कायम असून गेल्या वर्षभरात एकूण अपघातांपैकी १३ टक्के अपघात राज्यात झाल्याचे चित्र भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे. देशात १३ राज्यांमध्ये एकूण अपघातांपैकी ८७ टक्के अपघात होतात. अशा राज्यांच्या यादीत २०१४ या वर्षांत महाराष्ट्राचे स्थान दुसरे आहे. राज्यात वर्षभरात एकूण ६१ हजार ६२७ अपघात झाले. त्यात १२ हजार ८६३ जणांचा बळी गेला. मृत्यूच्या संख्येत राज्याचे स्थान तिसरे आहे. राज्यात दरवर्षी ६० हजारांहून अधिक रस्ते अपघात होतात आणि १ लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण ५२ ते ६० इतके आहे. अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे तरुणांचे झाले आहेत. राज्यात रस्त्यांवरील अपघातात गेलेले ५३ टक्के बळी हे १५ ते ३४ वयोगटातील आहेत. रस्त्यांची खराब अवस्था, गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसणे, धोक्याच्या ठिकाणी दुभाजक असणे, अतिवेगामुळे वाहनावरचा ताबा सुटणे, दारू पिऊन गाडी चालवणे, समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे, धोकादायक वळणावर वेगाने गाडी चालवणे, पार्किंग लाईट न लावता महामार्गावर गाडी थांबवणे, अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. अनेक उपाययोजना राबवूनही राज्यात अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. दुचाकींच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झालेली असताना या अपघातांचीही संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक दुचाकीला ‘अॅन्टी ब्रेकिंग सिस्टिम’ (एबीएस) आणि ‘कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टिम’ (सीबीएस) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी एप्रिल २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. वाहन भरधाव जात असताना अचानक ब्रेक दाबल्यास वाहन भरकटण्याची किंवा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते. वाहनांमध्ये ही व्यवस्था लावल्यास वाहन घसरण्याची शक्यता कमी असते. टायरवर नियंत्रण ठेवणे शक्य होते, असे सांगितले जाते. पण, या उपाययोजना राबवूनही अपघात कमी करणे शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात २०१२ आणि २०१३ च्या तुलनेत गेल्या वर्षी रस्ते अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी गंभीर अपघातांचे प्रमाण मात्र वाढल्याचे दिसून आले आहे. देशातील अपघाती मृत्यूमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण हे गेल्या वर्षी १२.६ टक्के होते. दहा हजार वाहनांमागे अपघातांचे प्रमाण सरासरी ३० आहे. जखमींच्या संख्येतही महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात सुमारे २.५ कोटी वाहने वापरात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत ९.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ांचे २०१३-१४ या वर्षांत ३ हजार १५४ अपघात झाले. त्यात ५३३ जण मृत्यूमुखी पडले. ६ हजार २८१ व्यक्ती जखमी झाल्या. दरलाख किलोमीटरमागे अपघाताचे प्रमाण ०.१५ आहे.‘सुरक्षा हे केवळ घोषवाक्य नसून तो जगण्याचा मार्ग आहे’ या ब्रीद वाक्यासह रस्ता सुरक्षा पंधरवडा पाळण्यात येतो. विविध पथनाटय़े, व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते, पण अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही.