“राजकीय किमान समान फसवणूक करुन सत्तेत आलेल्या तिघाडी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची किमान समान फसवणूक कार्यक्रमच आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

महाविकासआघाडी सरकारचा दुसरा (२०२१-२२) अर्थसंकल्प आज(सोमवार) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.

Petrol Rate Hike : केंद्राला बोलण्याचा ठाकरे सरकारला अधिकारच राहिला नाही – फडणवीस

शेलार म्हणाले, “आघाडी सरकारने सत्तेत येताना जी किमान समान आश्वासने दिली ती इतिहास जमा झाली आहेत. आजच्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासन पुर्तीचा कोणताही कार्यक्रम नाही. शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक असे अनेक समाज घटक करोनामुळ अडचणीत आले त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष तरतूद नाही.”

आणखी वाचा- “भाजपाची मक्तेदारी आहे का? आम्हाला काही कळतच नाही का?” अजित पवार भाजपावर भडकले!

अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प  –

तसेच, “शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हे सरकार विसरले तसेच पहिल्या अधिवेशनात विधानभवनात ज्या बारा बलुतेदारांना आणून त्यांच्या सोबत फोटो काढले त्या बारा बलुतेदारांना कोविड काळात काही दिले नाहीच, आता अर्थसंकल्पात ही त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. १ रूपयात आरोग्य सेवा, ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ अशी अनेक आश्वासने हवेत विरली आहेत. वीज बिलात माफी नाही, पेट्रोल डिझेल भाव कमी करु सांगितले त्याबद्दल कोणती घोषणा नाही. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नाही. अशा अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे.” अशी देखील शेलार यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली.

आणखी वाचा- पुण्याला अर्थसंकल्पातून काय मिळालं?; वाचा महत्त्वाच्या घोषणा

मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली –

“मुंबईतील भाजपा सरकारच्या काळातील जुन्या प्रकल्पांची नावे फक्त वाचून दाखवली. केवळ अट्टाहासाने मुंबईकरांच्या माथी मारण्यात येणाऱ्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचे ढोलमात्र जोरात वाजवण्यात आले. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या बजेटमधील प्रकल्प प्रथमच राज्याच्या अर्थसंकल्पात दाखवून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री मुंबईकरांसाठी काहीतरी देतील अशी अपेक्षा असलेल्या मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.” असा आरोपही शेलार यांनी यावेळी केला.