पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे अस्ताव्यस्त झालेले जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. दरम्यान, उद्या होणाऱ्या ईदचा सणाला बकऱ्याची कुर्बानी न देता त्याचा संपूर्ण खर्च हा पूरग्रस्तांना देण्याचा पुरोगामी निर्णय कोल्हापूरातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

कोल्हापूर जिल्हा गेल्या आठवडाभरापासून पुराच्या पाण्याखाली गेला आहे. अद्यापही इथली स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. कोल्हापूरात आलेल्या इतक्या भीषण आस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर ईद साजरी करण्यासाठी लागणारे बोकडांची कुर्बासाठी येणारा खर्च टाळून तो खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय इथल्या मुस्लिम समाजाने घेतला आहे. मुस्लिम तरुणांनी यासंदर्भात आपल्या समाजाला आवाहन केले आहे. न्यूज १८ने याबाबत वृत्त दिले आहे.

या तरुणांनी म्हटले आहे की, बकरी ईदला बोकडं खरेदीसाठी येणारा सुमारे वीसऐक हजार रुपयांचा खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात यावा. इस्लाममध्ये कुर्बानीचे हेच तत्व असल्याचे हे तरुण सांगतात.