ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे त्यांच्याबरोबर मी काम करतो, त्यांच्याकडे हे दोन्हीही नाही. संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशा कठोर शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली. “राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो” असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपाची साथ सोडण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात पुन्हा धरण्याचे संकेत दिले होते, त्याला राजू शेट्टी यांनी उत्तर दिलं आहे.

शेट्टी म्हणाले, “मी गेली ३५ वर्षे चळवळीत काम करत आहे. मला स्वच्छ हाताच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसासोबत काम करण्याची सवय आहे. ज्यांना समिती नेमून संघटनेतून हाकलून लावलं आहे त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. सदाभाऊ खोत यांना हाकलण्याचं मूळ कारणचं हे होतं की ते स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य या आमच्या निकषांमध्ये बसत नव्हते.”

“शेतकऱ्यांबाबत पुतणा-मावशीचं प्रेम अनेक जण दाखवतात. पण त्यात गांभीर्य किती आहे हे बघावं लागेल. म्हणून मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या खोतांबद्दल आम्हाला काहीही वाटण्याचं कारण नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आणि आमच्या मार्गानं चाललो आहोत आणि जात राहू. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असेल म्हणूनच कदाचित ते आमच्याप्रती प्रेम भावना व्यक्त करीत आहेत. पण यांच्या अशा मायावी बोलण्याला कोणी फसणार नाही.” अशा कठोर शब्दांत शेट्टी यांनी खोत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

खोत यांना खरोखरच पश्चाताप होत असेल तर त्यांनी सुरुवातीला ज्या गोरगरीब शेतकऱ्यांचे कडकनाथ घोटाळ्यात पैसे बुडाले. यामुळे जे आज तडफडत आहेत त्यांची दिवाळी वाईट झालेली आहे. त्यांचे पैसे परत करावेत मगच त्यांच्या मागणीवर जरा विचार करता येईल, अशी रोखठोक भूमिकाही यावेळी राजू शेट्टी यांनी मांडली.