चकलांबा येथे तागड वस्तीशेजारी असलेल्या तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेने तागड कुटुंबीयांवर शोककळा पसरली. यापूर्वीही या कुटुंबातील दोन मुले याच तलावात बुडून मृत्यू पावली होती.
गेवराई तालुक्यातील चकलांबा गावाजवळील तलावाला लागूनच असलेल्या वस्तीवर काळाराम तागड हे शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांची १० ते १३ वषार्ंची तीन मुले नेहमीप्रमाणे तळयाभोवती गुरे राखायला गेली होती. रविवारी सायंकाळी गुरे घरी आली. मात्र, मुले आली नाहीत. त्यामुळे तागड हे रात्री आठच्या सुमारास बॅटरी घेऊन तलावाच्या दिशेने गेले असता त्यांना मुले तलावात बुडाल्याचा संशय आला. त्यांनी गावातील लोकांना बोलावून शोध घेतला असता मुलांचे मृतदेह दिसून आले. यात सरिता (वय १३), महादेव (वय १०) व नारायण (वय ७) यांचा समावेश आहे. रात्री उशिरा चकलांबा पोलिसांनी पंचनामे करून नोंद केली. यापूर्वी तागड यांचे बंधू यांचीही दोन मुले याच तलावात बुडून काही दिवसांपूर्वी मृत पावली होती.