अलिबाग : महाड येथील विषबाधा प्रकरणात तीन चिमुकल्यांचा जीव गेला. त्यामुळे संपूर्ण महाड गावावर शोककळा पसरली. काल ज्या गावात वास्तुशांतीचा उत्साह साजरा होत होता, आज त्याच गावात भयाण शांतता आणि हृदय पिळवटणारा आक्रोश पाहायला मिळत होता. मूळचे कर्नाटकमधील येले जिल्ह्यातील शिंदे कुटुंब कामानिमित्त रायगड जिल्ह्यात स्थायिक झाले आहे. गेली दोन दशकांहून अधिक काळ ते महाड येथील नवीन वसाहतीत वास्तव्याला आहेत. सोमवारची रात्र या कुटुंबासाठी काळरात्र ठरली आहे. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा विषबाधा प्रकरणात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबावर ओढावलेल्या या आपत्तीने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शिंदे कुटुंबातील तीन भाऊ गावात ट्रान्स्पोर्टेशनचा व्यवसाय करतात. कामानिमित्त त्यांचे देशभरात दौरे सुरू असतात, तर कुटुंबातील महिला आणि मुले महाड येथे वास्तव्य करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबातील महिलाही घरखर्चास हातभार लागावा म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी नित्यनियमानुसार घरातली सर्व मंडळी कामा नमित्त बाहेर पडली होती. तर राज शाम शिंदे, प्रगती शाम शिंदे, राधा शाहूराज शिंदे आणि ऋषीकेश शाहुराज शिंदे ही चारही मुले शाळेत गेली होती. शाळेतून घरी परतल्यावर संध्याकाळी सर्व मुले सुभाष माने यांच्याकडे वास्तुशांतीला गेली. तिथे पोटभर जेवली. घरी आल्यावर थोडय़ा वेळाने चौघांनाही उलटय़ा आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे भांबावलेली मुले शेजारच्या रेश्मा विश्वास यांच्याकडे गेली. कसे तरी होत असल्याची तक्रार केली. मुलांचे पालक घरी नसल्याने त्या प्रचंड घाबरल्या. पालकांना तातडीने घरी येण्याची सूचना केली आणि मुलांना खोपोली येथील दवाखान्यात पाठवले. दरम्यानच्या काळात मुलांची तब्येत अधिकच बिघडली. त्यामुळे चौघांनाही पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ऋषीकेश शिंदे आणि प्रगती शिंदे यांचा मृत्यू झाला. राधा आणि राज यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. काल ज्या परिसरात वास्तुशांतीचा उत्साह होता. लोकांची रेलचेल होती. आज तिथे भयाण शांतता अनुभवायला मिळत होती. नातेवाईकांचा हृदय पिळवटणारा आक्रोश होता. एका दिवसात हसते खेळते शिंदे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. परिस्थितीपुढे ते हतबल आहेत. प्रगतीचे वडील कामानिमित्त विशाखापट्टणमला गेले आहेत. ते आल्यानंतरच प्रगती आणि ृऋषीकेशच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. या विषबाधेमुळे कोवळ्या मुलांचा जीव गेला असून त्यांच्या कुटुंबावर पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे.