मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र अजुनही सुरुच आहे. रायगड जिल्ह्य़ातील नागोठणे जवळ झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला,  तर २९ जण जखमी झाले. यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.  मालवणच्या मसुरा येथुन लक्झरी बस मुंबईकडे निघाली होती. पहाटे ४ वाजता नागोठणे जवळील पळसगाव जवळ ही बस आली असतांना, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कोसळली. या अपघातात बस मधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य २९ जण जखमी झाले. अपघातात सुहास बावळ्या गोडे (३२), संदीप सुधाकर राणे (३५) आणि अतुल अशोक तावडे (३५) यांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू  झालेल्या सुहास गोडे यांची पत्नी सुवासिनी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्या सर्वाना मुंबईच्या सायन हॉस्पीटल आणि पनवेलच्या लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी आठ जणांची प्रकृती अंत्यंत चिंताजनक आहे.  हे जखमी सिंधुदूर्ग आणि ठाणे जिल्ह्य़ातील रहिवाशी आहेत.
चालकांचा बेदरकारपणा
 मुंबई गोवा महामार्गावरील खाजगी बस चालकांचा बेदरकारपणा अजूनही कमी झालेला नाही. रत्नागिरीत खेड जवळ १९ मार्चला झालेल्या अपघातात ३७ जणांचा बळी गेला होता तर १४ जण जखमी झाले होते. खाजगी बस चालकाचा बेदरकारपणा याला कारणीभूत होता. या अपघातानंतर खाजगी बस चालकांच्या बेदरकारपणा कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र बुधवारी पळसगाव येथे झालेल्या अपघातानंतर खाजगी बस मधील प्रवाश्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सध्या महामार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढते आहे.