भरधाव मालवाहू कंटेनर व एस.टी. महामंडळाची बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसमधील तीन शालेय विद्यार्थिनी ठार, तर ४६ विद्यार्थ्यांसह ५६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरनजीक नांदूरा मार्गावर वाघूड फाटय़ानजीक घडली.
या दुर्घटनेत कोमल सोपान चोपडे (१८), शीतल संतोष हिवाळे (१८), पूजा मारोती जुनारे (१९), या तीन विद्यार्थिनी ठार झाल्या. या अपघातातील जखमी अनेक विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात जखमी झालेल्या ३१ जणांना मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात, १० जणांना जळगाव खांदेश येथील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात, तर १७ जणांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय व मलकापूरच्या कोलते, बोरले व अन्य खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना जळगाव, बुलढाणा व मलकापूर येथे पाठविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले.