अलिबाग : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुण्याहून दिवेआगारकडे निघालेल्या तिघांवर गुरुवारी काळाने घाला घातला. ताम्हिणी घाटात एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

पुण्यातील आळंदी रोड येथे राहणारे हे सर्वजण दिवेआगरकडे निघाले होते. ताम्हिणी घाटातून येत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास कोंडेथर गावाजवळ त्यांचे वाहन झाडावर आदळले. या अपघातात चालक निखिल घुले, चंद्रकांत निकम, विक्रम सिंग जागीच ठार झाले. विजय पाटील आणि सुनील तेलंगे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर माणगाव आणि पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेला विक्रम सिंग हा परदेशात नोकरीला होता. सुट्टी घेऊन तो पुण्यात आला होता. या अपघाताची माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.