बॉलिवूडमधला बहुप्रतिक्षीत असा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी अनेक चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली. मात्र औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्समध्ये अचानक शो रद्द झाल्यानं संतप्त प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. तर काही प्रेक्षकांनी शिवाळीगाळ केल्याचाही प्रकार समोर आला आहे.

औंधमधल्या वेस्टएंड मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये हा प्रकार घडला आहे. आठ स्क्रीन असलेल्या मल्टीप्लेक्समधल्या एका स्क्रीनमध्ये हा प्रकार घडला. जवळपास ४०० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या मल्टीप्लेक्समध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चा  ९.१५ चा शो होता. दिवाळीनिमित्त प्रेक्षकांची गर्दी होती. मात्र शोची वेळ निघून गेल्यानंतरही शो सुरु न झाल्यानं प्रेक्षक अस्वस्थ झाले.

मल्टीप्लेक्सकडून तांत्रिक अडचणीचं कारण देण्यात आलं. तसेच प्रेक्षकांकडून अडचण सोडवण्यासाठी काही वेळ मागण्यात आला. तीन वेळा मल्टीपेक्सच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडचण असल्याचं कारण सांगत प्रेक्षकांना थांबवून ठेवलं. मात्र दिलेली मुदत संपूनही शो सुरु झाला नाही हे पाहून संतप्त प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्समध्ये गोंधळ घालायला सुरूवात केली. अखेर मल्टीपेक्सच्या कर्माचाऱ्यांनी तांत्रिक अडचणी सोडवण्यात आपण असमर्थ असल्याचं सांगत माफी मागितली, मात्र काही प्रेक्षकांनी शिवीगाळ करत गोंधळ घातला.

मल्टीप्लेक्सनं काही प्रेक्षकांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत केले तर काहींना दुसऱ्या शोचं तिकीट देण्यात आल्याचं समजत आहे. आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट देशभरातील ५ हजारांहून अधिक स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.