वाघांचे अस्तित्व असलेल्या देशभरातील १७ राज्यांतील ४५ व्याघ्र प्रकल्पांतील कोअर, बफर व नियमित जंगलांमध्ये उद्या, १६ जानेवारीपासून व्याघ्र गणनेला सुरुवात होत आहे. ट्राझीट लाईन व कॅमेरा ट्रॅपिंग पध्दतीने ही गणना केली जाणार असून राज्यातील ताडोबा, मेळघाट, पेंच, सहय़ाद्री व नवेगाव प्रकल्पांत व्याघ्र गणनेची तयारी पूर्ण झाली आहे.
देशभरातील ४२ व्याघ्र प्रकल्पांत दर चार वषार्ंनी वाघांची गणना केली जाते. या वर्षी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत प्रत्येकी एका व्याघ्र प्रकल्पाची भर पडल्याने यावर्षी ४५ व्याघ्र प्रकल्पांत ही गणना केली जात आहे. यावर्षी प्रथमच गोवा व नागालॅंड येथेसुध्दा व्याघ्र गणना होणार आहे. २०१० मध्ये व्याघ्र गणना झाल्यानंतर आता २०१४ मध्ये ही गणना केली जात आहे. उद्यापासून १८ जानेवारापर्यंत ट्रान्झीट लाईन टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर या १९ ते २३ जानेवारीपर्यंत प्रत्येक बिटात पाच किलोमीटर ट्रान्झीट लाईनवर भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य व तीन कर्मचारी काम बघणार आहेत. त्यासोबतच ठरवून दिलेल्या मार्गावर वन्यप्राण्यांची विष्टा व पगमार्क गोळा करणे, तसेच वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, सहय़ाद्री, नागझिरा, पेंच या पाच व्याघ्र प्रकल्पांसह गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, मेळघाट, वर्धा, तसेच पश्चिम, उत्तर महराष्ट्रासह राज्यातील ५ हजार ५०० बिटांतर्गत ही गणना केली जाणार आहे. ताडोबा प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मोहुर्ली, कोळसा व ताडोबा या तीन परिक्षेत्रांतील ९ राऊंड, ३४ बिट व १७८ कंपार्टमेंटमध्ये १५० वनगार्डच्या माध्यमातून हा गणना कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कोअर झोनमध्ये ४७ ट्रान्झीट लाईन टाकून प्रपत्र भरण्यात येणार आहे. यामध्ये वाघ, बिबट व अन्य मांसभक्षी प्राण्यांचा समावेश आहे. ट्रान्झीट लाईनचा अंतिम अहवाल १ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे. कॅमेरा ट्रॅपिंग पध्दतीने २० ते २५ जानेवारीपर्यंत ही गणना केली जाणार आहे.
ताडोबात २० जानेवारीपासून भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. हबीब बिलाल यांच्या नेतृत्वात कॅमेरा ट्रॅप लावण्याचे कामाला सुरुवात होणार आहे. यात डॉ. बिलाल यांना संशोधक आफताब उस्माणी, उर्जीत महेश भट्ट, कैनात लताफत, रूतू प्रजापती, मधुरा रौते यांच्यासह आठ जण मदत करणार आहेत. एकूण ३०० कॅमेरा ट्रॅप लावण्यात येणार असून, प्रत्येक दीड कि.मी. ग्रीडवर एक कॅमेरा राहणार आहे. हे सर्व कॅमेरे १५ फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यात येणार आहे. कॅमेरा ट्रॅपचा अंतिम अहवाल १ जून रोजी सादर करायचा आहे. मध्यप्रदेशातील कान्हा येथे प्रशिक्षण घेऊन आलेल्या विभागीय वन अधिकारी माडभुशी, चंद्रपूर वन विभागाचे एसीएफ पवार, मध्यचांदाचे रेड्डी यांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
उद्या सकाळी ६ वाजता गणना सुरू होईल अशी माहिती ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक सुजय दोडल यांनी दिली. ही गणना योग्य रितीने पार पडावी यासाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

ताडोबात ५० वाघांची नोंद
भारतीय वन्यजीव संस्थेने डॉ. हबीब बिलाल यांच्या नेतृत्वाखाली ताडोबात २०१३ च्या जानेवारी महिन्यात झालेल्या व्याघ्र गणनेत ५० वाघांची नोंद घेतली आहे. त्यासाठी ५४ दिवस ९४ लोकेशन्सवर ३०० कॅमेरा लावून ५ हजार ७६ छायाचित्रे घेण्यात आली. त्यात ४० वाघांची डाव्या व १० वाघांची उजव्या बाजूची छायाचित्रे घेण्यात आलेली आहेत.