सहा वाघांचा पैनगंगा अभयारण्यात स्थलांतरणाचा प्रस्ताव धूळ खात

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८८ आणि ब्रह्मपुरी वन विभागात ५८, असे विक्रमी १४६ पट्टेदार वाघ एकाच ‘लॅन्डस्केप’मध्ये असल्याने वाघांचा आपसातील संघर्ष विकोपाला पोहोचला असून गेल्या ७ महिन्यांत मृत्युमुखी पडलेल्या ६ पैकी बहुतांश वाघांचा मृत्यू अशाच संघर्षांतून झालेला आहे, त्यामुळेच चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने ६ वाघांचे स्थलांतरण पैनगंगा अभयारण्यात करण्याच्या पाठविलेल्या प्रस्तावाकडे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व राज्याच्या वन विभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

चंद्रपूर जिल्हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच असलेल्या ब्रह्मपुरी वन विभागात ५८ वाघ आहेत. बछडय़ांची संख्या सुमारे २६ आहे. एकाच परिसरात १४६ वाघ असल्याने आणि अस्तिवाच्या शोधात एकमेकांच्या अधिवासावर आक्रमण सुरू असल्यामुळे दोन वाघांमधील हा संघर्ष पराकोटीला गेला आहे. परिणामत: दोन वाघांच्या झुंजीत एकाचा बळी जात आहे. गेल्या ४ मे रोजी ताडोबाच्या डोणी क्षेत्रात मृतावस्थेत सापडलेला अवघ्या अडीच वष्रे वयाचा वाघ, ८ एप्रिलला रत्नापूरजवळील उमा नदीच्या पात्रात सापडलेली वाघीण, डोंगरगाव येथे २६ एप्रिलला मृतावस्थेत सापडलेला वाघ व खंडाळा येथे ५ जुलैला मृतावस्थेत सापडलेल्या वाघाचा मृत्यूही अशाच झुंजीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, बुधवारी ब्रह्मपुरी येथे मृतावस्थेत सापडलेला रेडिओ कॉलर लावलेल्या वाघाचा मृत्यूही असाच झालेला आहे. पूर्वी वाघांचे नैसर्गिक मृत्यू आणि शिकारीचे प्रमाण अधिक होते, परंतु गेल्या काही वर्षांतील आकडेवारी बघितली, तर चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघाच्या मृत्यूचे प्रमुख कारण हा संघर्ष आहे. तो जर कमी करायचा असेल तर येथील वाघ इतरत्र स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय नाही, कारण भविष्यात हा संघर्ष वाढतच जाणार आहे. हे लक्षात घेऊनच मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी ब्रह्मपुरी विभागातील ६ वाघ यवतमाळ-नांदेड सीमेवरील पैनगंगा प्रकल्पात पाठविण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व राज्याच्या वन विभागाकडे पाठविला होता, परंतु हा प्रस्ताव दोन्ही कार्यालयांत धूळ खात पडलेला आहे.

विविध वन्यजीव संस्थांची तीव्र नाराजी

कधी काळी या जिल्ह्य़ात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला होता. गेल्या ७ महिन्यांचा विचार केला, तर ६ वाघ व ७ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. या संख्येचा विचार केला, तर वाघ व बिबटय़ांमधील संघर्षच तीव्र झाल्याचे चित्र आहे. वाघांसोबतच ब्रह्मपुरी परिसरात बिबटय़ांची संख्या सुमारे १९६ आहे. ही संख्या लक्षणीय असून बिबटय़ांमध्येही संघर्षांत वाढ झाली आहे. बहुतांश बिबटे झुंजीत दगावले आहेत. वाघ-बिबटय़ांमध्येही संघर्ष झाल्याचे अधिकारी सांगतात, परंतु एनटीसीए व वन विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने वन्यजीवप्रेमी व या क्षेत्रातील विविध वन्यजीव संस्थांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.