बछडे ठार झालेल्या अपघातस्थळी आक्रोश

चंद्रपूर : चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तीन बछडय़ांची माता असलेल्या वाघिणीने अपघातस्थळाच्या बाजूलाच ठाण मांडले आहे. एकाच वेळी तीन बछडे गमावल्याने शोकाकूल वाघीण डरकाळी फोडून आक्रोश करीत आहे. या वाघिणीचे छायाचित्र वन विकास मंडळाने लावलेल्या ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये आले असून ती सुखरूप आहे.

रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या तीन बछडय़ांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर ही वाघीण याच परिसरात होती. रेल्वेच्या धडकेत तिचा सुद्धा मृत्यू होऊ नये म्हणून वन विभागाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत होती. चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, वन विकास महामंडळाचे ऋषिकेश रंजन, पी.आर. दावडा यांच्यासह वन विभागाचे संपूर्ण पथक गुरुवारी दिवसभर घटनास्थळी होते. वाघिणीच्या डरकाळीचा आवाज येत होता, परंतु ती कुणालाही दिसत नव्हती. त्यामुळे वन विकास महामंडळाने २० कॅमेरा ट्रॅप परिसरात लावले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला हे कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. आज सकाळी या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघिणीची असंख्य छायाचित्रे आली आहेत. या छायाचित्रांना बघितले तर ती अपघातग्रस्त स्थळाच्या आजूबाजूलाच फिरत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, एका छायाचित्रात तर वाघीण ज्या ठिकाणी तिन्ही बछडय़ांना अग्नी देण्यात आला. तिथे सुद्धा एकवेळा येऊन गेल्याचे दिसत आहे. यासंदर्भात वन विकास महामंडळाचे अधिकारी पी.आर. दावडा यांना विचारणा केली असता, २० कॅमेरा ट्रॅप घटनास्थळी लावले होते. त्यातील काही कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघिणीची छायाचित्रे आली आहेत. यात वाघीण स्पष्टपणे दिसत आहे. ती कोणत्या वेळेला, किती वाजता कॅमेरा ट्रॅपमध्ये आली याचीही नोंद त्यामध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले. एकाच वेळी तीन पिल्लं गमावल्याने वाघीण आक्रोश करीत असली तरी दोन ते तीन दिवसात ही नॉर्मल होईल, असेही दावडा यांनी सांगितले. साधारणत: अशा प्रकरणात वाघीण नरभक्षी होण्याची शक्यता अधिक असते, परंतु कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रे बघता अशी शक्यता कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. वाघिणीचे मॉनिटरिंग सुरू असून ती स्वस्थ असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रेल्वे चालकाला चौकशीला बोलावणार

चांदा फोर्ट-गोंदिया या पॅसेंजर गाडीच्या ज्या चालकाने केळझर येथे नोंद केली आहे, त्याला चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती दावडा यांनी दिली. सोबतच जंगलातून रेल्वेची गती कमी असावी यासाठी रेल्वे विभागाला पुन्हा एक पत्र देऊन स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही सांगितले.