राज्य सरकारने एकीकडे राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केलेली असताना, दुसरीकडे राज्यातील करोनाच्य दैनंदिन आकडेवारीतही दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. राज्यात आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यासाठी हे काहीसे दिलासादायकच म्हणावे लागणार आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ८६९ नवीन करोनाबाधित आढळले तर, ८ हजार ४२९ रूग्ण करोनातून बरे झाले. याशिवाय, आज ९० रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली. राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. तर, आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१५,०६३ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३३०३८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

Maharashtra Unlock : नवी नियमावली जाहीर ; पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम!

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८३,५२,४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१५,०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६१,६३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७५,३०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.