राज्यात आज दिवसभरात ७ हजार ८६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर, ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय ६ हजार ३३२ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण २०,३६,७९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.८९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,५५,७८४ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ३,५५८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७९,०९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशभरात सोमवारी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे.