राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत.  शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. यामुळे सर्वसामान्यांसह सरकारचीही चिंता वाढत आहे. आज (गुरूवार) दिवसभरात  ८ हजार ९९८ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ करोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार  १०९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Update : मुंबईचा डबलिंग रेट २३८ दिवसांवर; पण रुग्णवाढीची चिंता कायम!

देशात करोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये अनेक नागरिक करोना संपल्याच्याच आविर्भावात वावरत असल्याचं दिसून आलं आहे. असंच काहीसं चित्र मुंबईत देखील पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत करोनासंदर्भातली बदलती आकडेवारी डोळ्यांसमोर ठेवणं आवश्यक आहे. एकीकडे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित वाढू लागल्यामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले असताना मुंबईत देखील पुन्हा निर्बंध घालण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. गेल्या २४ तासांतली मुंबईतली आकडेवारी पाहिल्यास राज्य सरकार पुन्हा निर्बंधांचा विचार का करत आहे, याची प्रचिती येऊ शकते.