राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय मृत्युंची संख्येतही भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,०९,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,७९,१८५ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,६०,५०० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८२ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशात सध्या करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरूवात झालेली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात केले जात आहे. तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जात आहे.

महत्वाची माहिती : ४५ वर्षावरील हे रुग्ण घेऊ शकतात करोनावरील लस

४५ ते ५९ वर्षे वयाच्या ज्या व्यक्तींना कोमॉर्बिड आजार आहेत त्यांनी कोविन अॅपवर नाव नोंदवल्यावर, ते ज्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत, त्यांचे प्रशस्तीपत्रक घेऊन लसीकरण करावयाचे आहे. मात्र, यात समाविष्ट असलेल्या आजारांबाबात डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे.