गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या संख्येने करोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत होती. रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांचा आकडा थेट ५० ते ६० हजारांच्या घरात जाऊन पोहोचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या करोना रुग्णांची आकडेवारी उलट्या क्रमानं घसरू लागली असून मंगळवारी दिवसभरात राज्यात १४ हजार १२३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५४ लाख ३१ हजार ३१९ इतका झाला असून रिकव्हरी रेट थेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मृतांचा आकडा चिंतेची बाब! दरम्यान, करोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी मृतांचा आकडा ही राज्य सरकारसाठी आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना मृतांची रुग्णांची संख्या आता ९६ हजार १९८ इतकी झाली आहे. तसेच, राज्याचा मृत्यूदर देखील १.६७ टक्के झाला आहे. दरम्यान, आजच्या १४ हजार १२३ नव्या करोनाबाधितांसोबत राज्यात आजपर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ इतकी झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे त्यात २ लाख ३० हजार ६८१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात एकाच दिवसात ३८४ नवे रुग्ण, २८ मृत्यू पुणे शहरात दिवसभरात ३८४ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर आज अखेर ४ लाख ७० हजार ३११ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८ हजार २८४ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ८५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ५६ हजार ५०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.