आजपासून महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात वाढणाऱ्या करोना रुग्णांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे आजपासून राज्या निर्बंध लागू झाले असताना दुसरीकडे आज दिवसभरात राज्यात तब्बल ५८ हजार ९५२ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा ३५ लाख ७८ हजार १६० इतका झाला आहे. यापैकी आजघडीला राज्यात ६ लाख १२ हजार ०७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ८१.२१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे मृतांचा आकडा खाली येण्याची चिन्ह दिसत नसून दिवसभरात एकूण २७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे करोनामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ५८ हजार ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

समजून घ्या : महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नेमके काय आहेत नियम? काय सुरू आणि काय असेल बंद?

महाराष्ट्राचा मृत्यूदर सध्या १.६४ टक्के इतका आहे. राज्यात दिवसभरात झालेल्या २७८ मत्यूंपैकी सर्वाधित ५४ मृत्यू हे मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये नोंदवण्यात आले आहेत. एकट्या मुंबईत आजपर्यंत करोनामुळे एकूण १२ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात दिवसभरात ४२०६ नव्या रुग्णांची नोंद!

पुणे शहरात दिवसभरात ४ हजार २०६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ३ लाख ४४ हजार २९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजार ९०२ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ४ हजार ८९५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ८४ हजार ८०१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.