हरिश्चंद्रगडावर आलेल्या नाशिक येथील एका पर्यटकाचा ओढय़ात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी गडाच्या पायथ्याशी पाचनई गावाच्या शिवारात ही घटना घडली.
बुडून मृत्यू पावलेल्या पर्यटकाचे नाव विवेक कैलास शिंदे (वय ३९, रा. गंगापूर रोड, सावरकर नगर, नाशिक) असे आहे. नाशिक येथील पाचजण मंगळवारी हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी खाजगी वाहनाने आले होते. हरिश्चंद्रगड परिसरात आज मुसळधार पाऊस सुरू होता. निम्मा गड चढून गेल्यानंतर पावसामुळे त्यांनी वर जाण्याचा बेत रद्द केला व ते माघारी फिरले. गड उतरून आल्यानंतर पाचनई गावालगतच्या ओढय़ाच्या काठी ते काही काळ थांबले. पॅन्टला चिखल लागल्यामुळे ती धुण्यासाठी विवेक ओढय़ावर गेला होता, मात्र पाय घसरून तो ओढय़ात पडला. पाण्याला वेग असल्यामुळे तो वाहत गेला व ओढय़ात बुडून गतप्राण झाला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ निरंजन हाही होता, त्यानेच राजूर पोलीस स्टेशनला या घटनेची खबर दिली. राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली आहे.