बंदी असतानाही पर्यटकांचा वावर कासा : जव्हारपासून अवघ्या सात कि.मी अंतरावर असलेल्या (काळशेती) नदीवरील काळमांडवी धबधब्याच्या जवळपास फिरणे पर्यटकांसाठी अत्यंत धोकादायक झाले आहे. येथील सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने नुकताच पाच तरुणांचा या धबधब्यात मृत्यू झाल्याच्या घटनेने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जव्हार शहर १ जुलैपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने धबधब्यांवर वावरण्यास बंदी आहे. तरी देखील येथे काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करीत पार्टी करणे, धिंगाणा घालणे, नशा करणे, पोहायला उतरणे असे प्रकार येथे करत असतात. ग्रामस्थ त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यास ते जुमानत नाहीत. पाच तरुणांचा झालेला मृत्यू हाही त्यास कारणीभूत आहे, असे येथे सांगितले जाते. काळमांडवी धबधबा हा आपटाळे ग्रामपंचयात हद्दीत येत आहे. ग्रामपंचायत तथा संबंधित विभागाने येथे सूचना फलक लावले पाहिजे होते, यात जमिनीपासून धबधबा ८०० फूट खोल आहे, तीन मोठमोठे डोह आहेत, डोहाची लांबी रुंदी, पाण्यात उतरू नये, आदी धोकादायक बाबींचे सूचना फलक लावणे बंधनकारक आहे, मात्र स्थानिक प्रशासने याबाबत दुर्लक्ष केलेले असल्याचा आरोपही होत असून आता तरी जागे व्हा असे म्हणण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. जव्हार हा उंचावर वसलेला भाग असल्याने, सर्वत्र दऱ्याखोऱ्यातून धबधबे वाहताना दिसत आहेत. मात्र ज्या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकस्थळी धबधब्यांवर पर्यटक येतात, त्या पर्यटनस्थळी यापूर्वी घडलेल्या अघटित घटनांबाबत माहिती फलक लावणे गरजेचे आह, मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.