वाघाच्या सहा महिने वयाच्या तीन बछड्यांचा रेल्वेने चिरडल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. चंद्रपूरमधील जुनोना फॉरेस्ट रेंजमध्ये गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. त्याचबरोबर, ठार करण्यात आलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीचे बेपत्ता असलेले दोन बछडेही पहिल्यांदा येथील विहीरगाव येथे दिसून आले आहेत.

यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी अवनी वाघिणीचे बछडे एकत्र दिसून आले आहेत, त्या ठिकाणी वनरक्षकांचे पथक पाठवण्यात आले आहे. यावरुन हे दोन्हीही बछडे सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले असून लवकरच त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात येईल.

रेल्वेखाली चिरडून वाघाच्या तीन बछड्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
——————————————————————————————————————————-

रेल्वेखाली चिरडून ठार झालेल्या तीन बछड्यांसदर्भात बोलताना चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक रामा राव म्हणाले, गोंदियाच्या दिशेने निघालेल्या बल्लारपूर-गोंदिया रेल्वेखाली या तीन बछड्यांचा चिरडून मृत्यू झाला. या बछड्यांचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी आहे. सुरुवातीला आम्हाला एक नर आणि एक मादी बछडे रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळून आले होते. तर एक बछडा सुमारे ५०० मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळून आला त्याच्या शरीराचे तुकडे झाल्याने तो नर जातीचा होता मादी हे कळू शकलेले नाही.

या तिनही बछड्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले असून यामध्ये त्यांचा मृत्यू कोणत्याही वीजेच्या धक्क्यांनी किंवा विष पिल्याने झाल्याचे आढळलेले नाही. मात्र, रेल्वेचा ड्रायव्हर अहमद यांनी पुढील केलझार स्टेशनवर याबाबत माहिती दिली. यामध्ये हे तिनही बछडे आधीपासूनच रेल्वे रुळावर पडलेले होते असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, ड्रायव्हरला उद्या सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे राव यांनी सांगितले.

या भागातून बल्लारपूर-गोंदिया या मार्गावर दररोज चार रेल्वे रवाना होतात. या रेल्वेचा मार्ग हा घनदाट जंगलातून जातो. त्यामुळे येथे रेल्वे ट्रॅकवर अनेकदा वाघांसह जंगली प्राणी, बिबटे येत असतात. २०१२ मध्ये याच रेल्वेखाली एका वाघिणीचा चिरडून मृत्यू झाला होता. तर दुसरा एक वाघ जखमी झाला होता. त्याचबरोबर यापूर्वी काही बिबटे आणि अस्वलांचाही असाच रेल्वेच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे.