तुळजापूर घाटाच्या वळणावर मळीचा कंटेनर सोलापूरकडे जाणाऱ्या अल्टो कारवर उलटल्याने कारमधले सात भाविक जागीच ठार झाले. तर चारजण जखमी झाले. सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींमध्ये एका आठ वर्षांच्या लहान मुलीचाही समावेश आहे. सोलापूर मार्गाने मळी घेऊन तुळजापूरच्या दिशेने जाणारा टँकर या कारवर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला अशी माहिती मिळते आहे. जखमींना उस्मानाबादच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संदिप घुगे, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे , योगेश खटाणे , अतुल यादव यांनी भेट दिली.

या गंभीर अपघातामध्ये रजनी प्रेमकुमार चिलधरे (वय ३५), शिवकुमार गोविंद पोवत्ते (वय ४० वर्ष) , नर्मदा शिवकुमार पोवत्ते (३५ वर्ष) , नेताजी शिवकुमार पोवत्ते (१२ वर्ष) , श्रध्दा शिवकुमार पोवत्ते (वय ४ वर्ष) , अपर्वा प्रेम कुमार चिलवरे (१३ वर्ष) , वर्षा लिंबराज अडम (१२ वर्ष) या सात जणांचा मृत्यू झाला आहे . जखमी झालेल्या भाविकांमध्ये नागेश कॅनम (वय ३२) , मयुरी नागेश कॅनम (वय २५) , ऋतीका शिवकुमार पोवत्ते (वय १५) , श्रावणी भालचंद्र महुत (वय आठ वर्ष) यांना शासकिय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.