पतीशी झालेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलांना विहिरीत ढकलून स्वतही आत्महत्या करण्याचा प्रयत्न शिराळा येथील विवाहित तरुणीने रविवारी केला. पोलिसांनी दोन मुलांचा खून व आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी या तरुणीला अटक केली आहे.
शिराळा येथील वैशाली सुनील कानकात्रे (वय २५) ही पती सुनील बाळासाहेब कानकात्रे याच्यासह मुले संकेत (४), अक्षय (३) यांच्यासह नाजरे गल्लीत राहते.  सासू, सास-यापासून हे कुटुंब विभक्त राहत महिलेचा भाजीपाला व धान्य विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायात अनिश्चितता असल्याने पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. शनिवारी रात्री उभयतांमध्ये स्वयंपाकाच्या कारणावरून भांडण झाले होते. रविवारी पती घराबाहेर पडल्यानंतर दोन मुले – संकेत व अक्षय यांना घेऊन वैशालीने विहिरीमध्ये उडी टाकली. यामध्ये दोन मुले बुडून मृत्यू पावली. मात्र महिलेला पोहण्यास येत असल्याने ती वर आली. तेथून शिराळा पोलीस ठाण्यात जाऊन पतीने मुलांना विहिरीत टाकले असल्याचे सांगत पतीवरच आरोप करण्याचा बनाव केला. मात्र पोलीस तपासात ही बाब उघड होताच पोलिसांनी तरुणीला अटक करून तिच्याविरुद्ध खून व आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.