राज्य सरकारने आज २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश आहे. राज्य सरकारने त्यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती.

तुकाराम मुंढेंची काम करण्याची पद्धत कशी आहे?
आता त्यांची भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असून त्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव सरकारने ही खेळी खेळल्याचे बोलले जाते. तुकाराम मुंढे हे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी कधीही नियमबाह्य गोष्टींना थारा दिलेला नाही. त्यामुळेच राजकरण्यांना ते नेहमीच खुपतात.

सर्वपक्षीय राजकारणी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात एकत्र का येतात?
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागांमध्ये त्यांची बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्दावरुन त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. नाशिक असो किंवा नवी मुंबई महापालिका नेहमीच सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे दिसले आहे.

राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच राजकारण्यांना जरी ते नकोस वाटत असले तरी, सर्वसामान्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे. असा हा अधिकारी आता नागपूर मनपाचा आयुक्त म्हणून पदभार संभाळणार आहे.