डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या एकाने नव्हे तर संस्थेने केली आहे आणि त्यांची राजकीय शाखा आपल्यावर राज्य करत आहे, अशा शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. नुसते भारत माता की जय बोलून काही होत नाही. तर भारत मातेवरील अत्याचारही रोखला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात जवाब दो रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी आदी मंडळी सहभागी झाली होती. रॅलीनंतर तुषार गांधी यांनी सांगितले की, दाभोलकरांची हत्या एकाने नव्हे तर संस्थेने केली. हीच लोक आता आपल्यावर राज्य करत आहेत. महात्मा गांधी यांची दररोज हत्या होत आहे. लोकांच्या मनात विष पेरले जात असून अशा विषारी विचारधारेपासून आजच्या तरुणांना लांब नेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विषारी विचारधारेविरोधात बोलणाऱ्यांमध्ये भय निर्माण केले जात आहे. याच लोकांनी देशाची फाळणी केली, असा आरोप त्यांनी केला.

भारत माता की जय म्हणून काही होत नाही. तर भारत मातेवरील अत्याचार रोखला पाहिजे. आपण सर्वांनी देशाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.