बंधाऱ्यातील पाण्यात बुडणाऱ्या लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा भावांचा मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यात मंगळवारी सायंकाळी घडली. परतीच्या मान्सूनने ओढेनाले तुडुंब भरून वाहत असल्याने ओढय़ावरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहिती अशी,की जत तालुक्यातील धुळकरवाडी-लमाणतांडा येथे बंधाऱ्यात पोहण्यासाठी काही मुले गेली होती. या वेळी अभिषेक पवार हा पाण्यातील भोवऱ्यात सापडल्याने बुडत असल्याचे लक्षात येताच पोहण्यासाठी आलेल्या संदीप राजू राठोड (वय १८) आणि भारत राजू राठोड (वय १६) या दोन सख्ख्या भावांनी बुडत असलेल्या अभिषेकला पाण्यातील भोवऱ्यातून बाहेर काढले. मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह आणि बंधाऱ्यालगतच्या भोवऱ्यात ते सापडले. यात सापडल्याने ते अचानक पाण्यात बेपत्ता झाल्याचे लक्षात आले.

ही माहिती मिळताच गावातील नागरिक त्यांच्या शोधासाठी पुढे सरसावले. मात्र सुमारे एक तासाच्या शोधानंतर दोघा भावांचे मृतदेह हाती लागले. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत अशी नोंद करण्यात आली आहे.