मुंबई – नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. खड्यांमुळे दुचाकीला अपघात होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून आई-वडील जखमी झाले आहेत.

शहापूर तालुक्यातील आवरे गावातील प्रकाश घरत आपल्या पत्नी रेखा घरत यांच्यासोबत दोन मुलांना घेऊन मुंबई -नाशिक महामार्गावरून दुचाकीवरुन चालले होते. रस्त्याने जात असताना मुंबई नाशिक- महामार्गावर पडलेले खड्डे चुकवत असताना त्यांचा दुचाकीवरुन तोल गेला. अपघातानंतर प्रकाश घऱत पत्नीसोबत रस्त्याच्या शेजारा जाऊन पडले तर दोन्ही मुले रस्त्यात पडली. यावेळी मागून येणारी गाडी त्यांच्या अंगावरुन गेली. अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर शहापूरमध्ये नागरिक संतप्त प्रतीक्रिया व्यक्त करत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.