गरजूंना अन्नदान करून परतत असताना रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री अमळनेर येथे हा अपघात झाला. राज्यात टाळेबंदी असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. अशाच लोकांना मदत करून परतत असताना हा अपघात झाला. अमळनेर येथील श्रीरामनगर परिसरातील आठ युवक गरजूंना अन्नदान करण्यासाठी झाडी आणि मुडी गावाला गेले होते. मुडी येथून परतत असतांना झाडी गावाजवळ अचानक त्यांची रिक्षा उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ऋषिकेश उमेश शेटे आणि विशाल दिनेश पाटकरी अशी या दोघांची नावे आहेत. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी जयेश पाटील याची प्रकृती चिंताजनक आहे. अक्षय महाजन आणि चेतन चौधरी हे किरकोळ जखमी असून जखमींना धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.