लातूर : कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी होत असल्याची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला. भामरी चौकात बुधवारी रात्री घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने लातूरसारख्या शैक्षणिक पंढरीचे शहर हादरले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण भारत राठोड (वय १८) व आनंद दिलीप चव्हाण (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. भामरी चौकात राहणारे भीमा चव्हाण व ललिता चव्हाण या पती-पत्नीत सतत भांडणे होत असत. त्यामुळे भीमा चव्हाण याने पत्नीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या रागापोटी ललिताचा भाऊ बालाजी राठोड हा बहिणीच्या घरी आला. या वेळी भीमाचा पुतण्या आनंद चव्हाण व भाचा अरुण राठोड यांच्यात वादावादी झाली. वाद हाणामारीपर्यंत गेला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आनंद चव्हाण व अरुण राठोड यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवत असताना आरोपींनी दोघांवरही चाकूने हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले. पोलिसांनी दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे अरुण राठोड व आनंद चव्हाण यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.