शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी दुपारी यवतमाळमधील बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द येथे घडली. आकाश राजेंद्र दुधकोर (१५), चेतन सुरेश मसराम (१६) अशी मृतांची नावे आहे. शेततळ्यात गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला .

ते दोघेही नांदुरा खुर्द शेत शिवारातील एक शेतकऱ्याच्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते . काम संपवून घरी परत येत असताना त्यांना पाण्याने भरलेले शेततळ दिसले. त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने त्यात ते अडकले. दोघेही पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेवून शेततळ्यात बुडालेल्या मुलांना बाहेर काढले. मात्र तो पर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.