उल्हासनगरमधील जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या दोन तरुणांची अंबरनाथमधील वडोल गावाच्या हद्दीत गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
राकेश विश्वकर्मा (वय २२), अमित धीरबलानी (वय २५) अशी मयतांची नावे आहेत. वडोल गावाजवळील वालधुनी नदीच्या पात्रात या तरुणांची मस्तके तरंगत होती. धड नदीबाहेर टाकण्यात आले होते. अपंग सेवा संघाचे अध्यक्ष भरत खरे सोमवारी सकाळी तेथून जात असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. त्या वेळी रविवारी पहाटे उल्हासनगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्यात दोन तरुण बेपत्ता असल्याची तक्रार या तरुणांच्या नातेवाईकांनी केली होती.